२७ सप्टेंबर
आज पाँडिचेरीत दाखल झालो. आजीची भेट झाली. तिला मी भेटल्यावर मला कुठे ठेवू नी कुठे नको झालं. किती काय काय - हे इथे बघ, ते तिथे असं काहीबाही न थांबता बोलत राहिली. मी ते बघावं यासाठीची तिची तळमळ ओसंडत होती. तर प्रथम आश्रमात समाधीचंच दर्शन झालं. सुंदर, मनोविभोर फुलांच्या देखण्या ओळी, संगमरवरी समाधीवर सुंदर नक्षीकाम केलेले. तिथल्या अनामिक शांततेत स्वतःला साधारण २०-२५ मिनिटं हरवून टाकलं असेल मी. कालच पाहिलेल्या पुट्टपर्थीच्या समोर आजचा अनुभव .... मनात नकळत तुलना होऊ लागली. कसा काय? तर काल तिथल्या भव्य मंदिरासमोरुन जाताना एक शब्द जरी तोंडातून काढला तरी 'साईराम! silence!' असे कानावर पडतं होते. या पार्श्वभूमीवर इथे मात्र कुणीही न सांगता बोलतं नव्हते. काहीही सांगायची गरजचं नव्हती. शांतता कशी ती आपोआपच रहात होती. या विरोधाभासाचं कारण काय असावं?
नंतर समुद्रकिनार्यावर नेहमीप्रमाणेच समुद्राचं सुरेख रुपडं बराचं वेळ डोळ्यात साठवलं नी परतलो.
इथे आल्याआल्या प्रथम जाणवली ती शांतता. मग कारणं उमजली - एकतर माताजी आणि ऑरोबिंदोंचे वास्तव्य आणि मग सायकलींचे वाढतं प्रमाण - म्हणून प्रदुषण खूप कमीये.
आज एका हॉटेल मध्ये गुजराती पध्दतीचे जेवण मिळाले. चार दिवस उपमम्, अन्नम, रस्सम, फिस्सम नी दमलेल्या जिभेला नी पोटालाही रुचकर दिलासा मिळाला.
२८ सप्टेंबर
आजची सकाळ फक्त पाँडिचेरीत फिरणं झालं. उन्हामुळे ओलेते कपडे नी खालीवर फिरवण्याच्या नादात सटकणारा स्कार्फ़! अशा आम्ही एका बेंगॉली रेस्तॉरॉमध्ये शिरलो. शोन्देश, चमचम, लवंगलतिका, लांगचा बघुनच जीभ रवरवायला लागली. पण एका लांगचा मधेच गोडघाशाचा डोंगर ढासळला.
आश्रमाचं जेवण जेवणे हा प्रकार आमच्याकरता नवा! सकाळचा नाष्टा व दोन जेवणं - अवघ्या २० रुपयांत! सकाळी कूपन काढणे - तेच दिवसभर जपून वापरणे. तर मग दुपारच्या जेवणानं सुरुवात झाली. शिस्तीचा बडगा किंवा पुट्टपर्थीतल्या सारखा "silence!" म्हणून आरडाओरडा नसतानाही लोक शांत रहात होते. तर आता रांगेने जाणे. प्रचंड मोठे वाडगे भरभरुन पण हवे तेवढेच वाढप - त्यामध्ये होते गोड / साधे दही, सर्व भाज्यांची 'अम्मा' भाजी, भात, खीर आणि ब्राऊन ब्रेड. जेवणानंतर बाबांचा चेहरा बघण्यासारखा. मला विनोबांच्या आश्रमातील जेवणापुढे हे जेवण पक्वान्न वाटले आणि म्हणून की काय - आवडले. नंतरही त्यांची ताटे - वाट्या धुण्याची पध्दत पाहण्याजोगी - व्यवस्थित स्वच्छता / शिस्त जास्त काही न बोलता - वाटलं की, इथे foreigner जास्त असल्यानं म्हणजे स्वयंसेवक म्हणून बरं का ! - कदाचित असा नम्रपणा असेल काय? कारण आजवर इथे जे जे युरोपियन्स भेटले ते कमालीचे नम्र, शिस्तप्रिय व गोष्टी अत्यंत प्रेमाने समजावणारे. हे त्यांच्याकडून उचलण्याएवजी, त्यांच्या संस्कृतीतला कचरा भाग घेणं, आपण लोक कधी सोडणार ??
क्रमशः
सुप्रिया
No comments:
Post a Comment